Monday, October 22, 2018


उमेदवारांनी जात वैधता प्रमाणपत्र सादर
करण्‍याची मुदत सहा ऐवजी बारा महिने 
      नांदेड दि. 22 :-  राखीव जागेवर निवडून आलेल्‍या उमेदवारांनी त्‍यांचे जात वैधता प्रमाणपत्र सहा महिण्‍याऐवजी बारा महिण्‍यात सादर करण्‍याबाबत अद्यादेश जारी करण्‍यात आला आहे. सदर सुधारणा अद्यादेशामुळे निवडून आलेल्‍या उमेदवारांना त्‍यांचे जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्‍यास आणखी सहा महिण्‍यांची मुदत वाढ मिळाली आहे.
 महाराष्‍ट्र ग्रामपंचायत आधिनियम आणि महाराष्‍ट्र जिल्‍हा परिषद व पंचायत समिती अधिनियम 1961 यामध्‍ये आणखी सुधारणा करण्‍याकरिता शासनाच्‍या ग्रामविकास विभागाने 10 ऑक्‍टोंबर 2018 रोजी सुधारित अध्‍यादेश जारी केला असून 11 ऑक्‍टोंबर 2018 रोजीच्‍या महाराष्‍ट्र शासन राजपत्रात प्रसिध्‍द करण्‍यात आला आहे. त्‍यानुसार अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती किंवा यथास्थिती नागरिकांचा मागासवर्ग यातील व्‍यक्‍तींसाठी राखीव असलेल्‍या जागेवर निवडणूक लढविण्‍यास इच्‍छूक असलेली व्‍यक्‍ती, नामनिर्देशन पत्रासोबत सक्षम प्राधिका-याने दिलेले जात प्रमाणपत्र आणि पडताळणी समितीने दिलेले वैधता प्रमाणपत्र निवडून आलेल्‍या दिनांकापासून सहा महिण्‍याच्‍या मुदतीच्‍या आत सादर करणे आवश्‍यक होते. सदर मुदतीत आणखी सहा महिण्‍याची वाढ करुन आता 12 महिण्‍याच्‍या आत जात वैधता प्रमाणपत्र सादर करता येणार आहे.
       सदर आदेशाच्‍या प्रारंभाच्‍या दिनांकापूर्वी कोणत्‍याही व्‍यक्‍तीने जात प्रमाणपत्र व वैधता प्रमाणपत्र प्राप्‍त केलेले असेल मात्र, असे प्रमाणपत्र दाखल केलेले नसेल अशा व्‍यक्‍तीने जर या आदेशाच्‍या प्रारंभाच्‍या दिनांकापासून पंधरा दिवसांच्‍या मुदतीच्‍या आत असे प्रमाणपत्र सादर केले तर अशी कोणतीही व्‍यक्‍ती प्रस्‍तुत पंचायत कायद्यांच्‍या तरतूदी अन्‍वये अनर्ह ठरली असल्‍याचे मानण्‍यात येणार नाही, परंतू या अद्दयादेशाच्‍या प्रारंभाच्‍या दिनांकापूर्वी राज्‍य निवडणूक आयोगाने अशा व्‍यक्‍तीचे रिक्‍त पद करण्‍यासाठी आधीच निवडणूक घेतली असेल किंवा निवडणूक घेण्‍यासाठी कार्यक्रम घोषित  केला असेल त्‍याबाबतीत या कलमाच्‍या तरतूदी लागू होणार नाहीत, असे  अद्यादेशात नमूद करण्‍यात आले आहे. 
00000


No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   401 लोकसभा निवडणुकीतील सहभागी कर्मचाऱ्यांचे यावर्षी विक्रमी मतदान   10 हजारावर  कर्मचाऱ्यांनी बजावला मताधिकार   नांदेड दि. 2 ...