Wednesday, October 24, 2018


कौशल्य सेतूमधील अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या
विद्यार्थ्यांना उच्च माध्यमिक शिक्षणाची संधी
अर्ज करण्यास 5 नोव्हेंबरची मुदत
नांदेड दि. 24 :- कौशल्य सेतूमधील व्यवसाय विषयाचा अभ्यासक्रम यशस्वीपणे पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना उच्च माध्यमिक शिक्षणाची संधी मिळणार आहे.
शैक्षणिक वर्षे 2018-19 पूर्वी कौशल्य सेतू अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या सर्व विद्यार्थ्यांना व त्यांच्या माध्यमिक शाळांनी शासन निर्णयाच्या अनुषंगाने पात्र विद्यार्थ्यांना इयत्ता दहावी प्रमाणपत्र परीक्षेसाठी ट्रान्सफर ऑफ क्रेडिटसचा लाभ घेता येईल.
दहावी प्रमाणपत्र परीक्षेकरीता ट्रान्सफर ऑफ क्रेडिटसचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी इयत्ता दहावीच्या परीक्षेला प्रविष्ठ झालेल्या माध्यमिक शाळेमार्फत राज्य मंडळाने विहित केलेल्या नमुन्यात अर्ज करुन नोंदणी करावी. मंडळाच्या www.mahahsscboard.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर डाऊनलोड करुन प्रिंट काढण्यासाठी उपलब्ध आहे. अर्जाची प्रिंट काढून तो अर्ज 5 नोव्हेंबर 2018 पर्यंत परिपूर्ण व बिनचूक भरावा. या अर्जावर विहित जागेवर स्वत:ची स्वाक्षरी करावी. तसेच तो ज्या माध्यमिक शाळेतून अंतिमत: माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेला इयत्ता दहावी प्रविष्ठ झाला आहे. त्या शाळेच्या मुख्याध्यापक, प्राचार्यांची सही व शिक्का घेऊन सदर अर्ज संबंधित विभागीय मंडळात जमा करावा.
अर्जासोबत माध्यमिक शालांत प्रमाणपत्र इयत्ता 10 वी सर्व परीक्षांचे गुणपत्रक व पीएमकेव्हीवाय (कौशल्य सेतू अभियान) प्रमाणपत्र इत्यादीच्या साक्षांकित प्रती जोडणे आवश्यक आहे. ही कागदपत्रे संबंधित मुख्याध्यापक / प्राचार्य यांनी मुळ कागदपत्रावरुन पडताळणी करुन स्वाक्षरीसह प्रमाणित करणे आवश्यक आहे. अर्ज विभागीय मंडळात जमा करताना त्यासोबत प्रक्रिया शुल्क 40 रुपये व गुणपत्रिका शुल्क 10 रुपये, असे एकुण 50 रुपये शुल्क राष्ट्रीयकृत बँकेचा धनाकर्ष / रोखीने विभागीय मंडळात जमा करावेत. धनाकर्ष डीडी विभागीय सचिव ....  विभागीय मंडळ .... यांचे नावे काढण्यात यावा. शाळांनी अर्ज 7 नोव्हेंबर 2018 पर्यंत संबंधित विभागीय मंडळात जमा करावेत.
या विद्यार्थ्यांना शासन निर्णयातील तरतूदीनुसार कौशल्य सेतू अभ्यासक्रम एका कोर्ससाठी दोन विषयांचे याप्रमाणे विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार देय असलेल्या एक किंवा दोन विषयासाठी (दोन भाषा व श्रेणी विषय वगळून) ट्रान्सफर ऑफ क्रेडिटस् देण्यात येतील. मात्र या ट्रान्सफर ऑफ क्रेडिट्स माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परिक्षेतील इयत्ता दहावी कोणत्या दोन विषयांसाठी (देय असलेल्या) घ्यावयाचे आहे. याची निश्चिती विहित नमुन्यातील अर्जात विद्यार्थ्यांने नमूद करणे आवश्यक आहे. अर्ज सादर केल्यानंतर यामध्ये कोणताही बदल करता येणार नाही. प्राप्त अर्जाची छाननी करुन पात्र विद्यार्थ्यांना शासन निर्णयातील तातुदीनुसार मंडळामार्फत गुणपत्रक व प्रमाणपत्र देण्यात येतील. वरीलप्रमाणे ट्रान्सफर ऑफ क्रेडिटस दिल्यानंतरही विद्यार्थी उत्तीर्ण न झाल्यास तो उर्वरित विषयासाठी पुनर्पपरीक्षार्थी म्हणून प्रविष्ठ होऊ शकेल. ट्रान्सफर ऑफ क्रेडिटस घेऊन विद्यार्थी माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा इयत्ता दहावी उत्तीर्ण झाल्यास पुन्हा मंडळाच्या या परीक्षेला नियमित अथवा पुनर्पपरीक्षार्थी म्हणून प्रविष्ठ होऊ शकणार नाही.
शैक्षणिक वर्षे 2018-19 पूर्वी कौशल्य सेतू अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या सर्व लाभार्थी विद्यार्थ्यांनी शासन निर्णयातील तरतुदींचा लाभ घेण्यासाठी विहित कार्यपद्धतीनुसार अर्ज करावेत व संबंधित माध्यमिक शाळांनी या प्रकरणी वेळेत कार्यवाही करुन सहकार्य करावे, असे आवाहन सचिव महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांनी केले आहे.
000000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   401 लोकसभा निवडणुकीतील सहभागी कर्मचाऱ्यांचे यावर्षी विक्रमी मतदान   10 हजारावर  कर्मचाऱ्यांनी बजावला मताधिकार   नांदेड दि. 2 ...