Saturday, April 7, 2018


शेतकऱ्यांनी शेतात गाळ
टाकून जमीन सुपीक करावी
- उपजिल्हाधिकारी डॉ. खल्लाळ
नांदेड, दि. 7 :- धर्माबाद तालुक्यातील मालगुजारी तलावातील अनेक वर्षापासुन साचलेला सुपिक गाळ काढणे व पाणीटंचाईमुक्त गाव करण्याबाबत जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांच्या प्रेरणेने गाळमुक्त तलाव व गाळयुक्त शिवार  अभियानांतर्गत जारिकोट मालगुजारी तलावातील गाळ  काढणे शुभारंभ धर्माबादचे उपविभागीय अधिकारी डॉ. सचिन खल्लाळ यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी नांदेडचे जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था पी. आर. फडणीस यांनी मार्गदर्शन केले.
जारिकोट येथील शेतकऱ्यांनी गाळ शेतात टाकण्यास सुरुवात करुन जमीन सुपिक व पाणी टंचाईमुक्त  करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. महसूल व कृषी उत्पन्न बाजार समिती धर्माबाद यांच्या संयुक्त विद्यमाने जारिकोट व चिकना येथे गाळ काढण्यात येत आहे. यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीने दोन जेसीपी डिझेलसह दिले आहेत. जारिकोट व चिकना येथील जवळपासच्या शेतकऱ्यांनी ट्रॅक्टरची व्यवस्था करुन मालगुजारी तलावातील काळी माती व  सुपिक गाळ शेतात टाकुन जमीन सुपीक करावी, असे आवाहन डॉ. खल्लाळ यांनी केले.
          कार्यक्रमास तहसिलदार धर्माबाद ज्योती चौहान, नायब तहसिलदार सुनिल माचेवाड, जलसंपदाचे उपविभागीय अभियंता प्रशांत कदम, धर्माबाद कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव सी. डी. पाटील, उपसचिव वैभव कुलकर्णी, सरपंच नागनाथ इंगळे, उपसरपंच संजय धुप्पे, आनुलोमचे रमेश कुंभारे, गजानन रामोड, चिकना येथील प्रगतशिल शेतकरी दत्ताहारी आवरे आदि उपस्थित होते.
000000

No comments:

Post a Comment