Tuesday, August 15, 2017

"उदय" योजना वंचितांसाठी वरदान   
- पालकमंत्री खोतकर
स्वातंत्र्यदिन ध्वजवंदनाचा मुख्य समारंभ उत्साहात संपन्न
नांदेड, दि. 15 :- भटक्या जमातीतील वंचित लोकांचे स्थलांतर रोखणे, त्यांना स्वत:च्या पायावर उभे करुन विविध योजनेचा लाभ मिळवुन देण्यासाठी नांदेड जिल्हा प्रशासनाची वंचितांसाठी "उदय" योजना वरदान  ठरेल, असा विश्वास राज्याचे वस्त्रोद्योग, पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्यविकास राज्यमंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अर्जुन खोतकर यांनी व्यक्त केला.  
भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या 70 व्या वर्धापनदिनानिमित्त मुख्य शासकीय समारंभात पालकमंत्री श्री. खोतकर यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. यावेळी शुभेच्छा संदेशपर भाषणात ते बोलत होते. जिल्हाधिकारी कार्यालय प्रांगणात मोठ्या उत्साहात राष्ट्रध्वज वंदनाचा कार्यक्रम संपन्न झाला.
या समारंभास ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक तसेच जिल्हा परिषद अध्यक्षा शांताबाई पवार, आ. अमर राजुरकर, आ. डी. पी. सावंत, आ. हेमंत पाटील, जिल्हाधिकारी अरुण डोंगरे, विशेष पोलीस महानिरीक्षक चिरंजीव प्रसाद, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक शिनगारे, पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीणा, मनपा आयुक्त गणेश देशमुख, अप्पर जिल्हाधिकारी संतोष पाटील, नांदेड जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे अध्यक्ष राम गगराणी, निवासी उपजिल्हाधिकारी जयराज कारभारी, जिल्हा परिषद, महापालिकेतील पदाधिकारी, ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक त्यांचे कुटुंबीय, माजी सैनिक, विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी, नागरीक, आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.  
शुभेच्छा संदेशात पालकमंत्री श्री. खोतकर म्हणाले की, कमी पर्जन्यमानामुळे पीक परिस्थितीवर मात करण्यासाठी अनेक प्रयत्न सुरु आहेत. कृषि विभागांतर्गत महत्वाकांक्षी योजना राबविण्यात येत आहेत. पर्जन्यमानातील खंड, पाण्याची टंचाई यामुळे कोरडवाहु क्षेत्रातील पिकांच्या उत्पादनावर विपरीत परीणाम होऊ नये, यासाठी दिर्घकालीन उपाययोजना म्हणून "मागेल त्याला शेततळे" ही योजना राबविण्यात आली आहे. सद्यस्थितीत 1 हजार 127 शेततळे पूर्ण असून 95 शेततळयांचे काम प्रगतीपथावर आहे. पंतप्रधान पिक विमा योजनेत राज्यात सर्वात जास्त नांदेड जिल्हयातील 6 लाख 97 हजार 42 शेतकऱ्यांनी सहभाग नोंदविला आहे. महसूल मंडळ स्तरावर स्वयंचलीत हवामान केंद्र उभारण्यासाठी महावेध प्रकल्प राबविण्यात येत आहे. जिल्हयात 80 स्वयंचलीत हवामान केंद्र उभारण्यात येणार असून सद्यस्थितीत 69 केंद्राची उभारणी करण्यात आली आहे. यामुळे हवामानाची आकडेवारी उपलब्ध होणार होऊन नुकसान भरपाई निश्चित होण्यास मदत होईल. शेतकरी राजाला दिलासा देण्यासाठी देशातील सर्वात मोठा कर्जमाफीचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. शेतकऱ्यांनी यासाठी ऑनलाईन अर्ज भरावेत, असे आवाहन त्यांनी केले.  
जिल्हा प्रशासनाच्यावतीने महिलांच्या आरोग्याची विशेष काळजी घेण्यासाठी हृदयरोगापासून ते कर्करोगापर्यंत सर्व आरोग्य तपासण्या प्राथमिक आरोग्य केंद्र व ग्रामीण रुग्णालयात करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. हा उपक्रम महाराष्ट्रासाठी पथदर्शी ठरेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. हागणदारीमुक्त महाराष्ट्र करण्यासाठी सर्वांचे योगदान महत्वाचे आहे. जिल्हा प्रशासन शौचालय नसलेल्या कुटुंबापर्यंत पोहोचून त्यांना शौचालय बांधण्यास प्रेरीत करत आहे. जिल्ह्यात दोनच दिवसात 24 हजार शौचालयाची खड्डे खोदुन शौचालय बांधण्यास गती दिली आहे. डिजीटल इंडिया भूमि अभिलेख आधुनिकीकरण कार्यक्रमांतर्गत अचुक ऑनलाईन सातबारा वितरण कामात नांदेड राज्यात अग्रस्थानी आहे. यावर्षी पर्जन्‍यमान जरी अपेक्षेप्रमाणे नसले तरी आगामी काळात समाधानकारक पाऊस होईल. त्‍यामुळे कोल्‍हापुरी पद्धतीच्‍या बंधाऱ्यांमध्ये पाणीसाठा होऊन त्‍याचा जिल्‍ह्यातील शेतकऱ्यांना नक्‍कीच फायदा होईल अशी आशा त्यांनी व्यक्त केली.   
यावेळी पालकमंत्री श्री. खोतकर यांनी स्वातंत्र्य सेनांनीच्या योगदानाप्रती अभिवादन केले आणि सर्वांना भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या. उपस्थित स्वातंत्र्य सैनिक, पदाधिकारी, अधिकारी, नागरिकांशी संवाद साधला. ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिकांची आस्थेवाईक विचारपूसही केली.
कार्यक्रमात पालकमंत्री श्री. खोतकर यांच्या हस्ते विविध परीक्षेतील उत्तीर्ण गुणवंत विद्यार्थ्यांना पुरस्काराचे वितरण करण्यात आले. नायब तहसिलदार स्नेहलता स्वामी व मुगाजी काकडे यांनी सुत्रसंचालन केले.
0000000



No comments:

Post a Comment

वृत्त क्र.   407 लोहा विधानसभा मतदारसंघामध्ये मतदान केंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश  नांदेड दि. ४ मे :- लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 प्र...