Monday, July 31, 2017

स्वातंत्र्य दिनाचा 70 वा वर्धापन दिन
समारंभ नियोजनाची बैठक संपन्न
           नांदेड दि. 31 :-  भारतीय स्वातंत्र्य दिनाचा 70 वा वर्धापन दिन मंगळवार 15 ऑगस्ट 2017 रोजी आहे. त्यानिमित्त मुख्य शासकीय ध्वजारोहण कार्यक्रम राज्याचे पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास, मत्सव्यवसाय व वस्त्रोद्योग राज्यमंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अर्जुन खोतकर यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील प्रांगणात 15 ऑगस्ट रोजी सकाळी 9.05 वा. होणार आहे. यासाठी नियोजनाची बैठक जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांच्या अध्यक्षतेखाली आज संपन्न झाली. स्वातंत्र्य दिन उत्साहात आणि नीटनेटक्या पद्धतीने, सुनियोजितपणे साजरा व्हावा यासाठीचे विविध निर्देश जिल्हाधिकारी श्री. डोंगरे यांनी बैठकीत दिले.
बैठकीस अप्पर जिल्हाधिकारी संतोष पाटील, नांदेड विभागीय जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे अध्यक्ष राम गगराणी, निवासी उपजिल्हाधिकारी जयराज कारभारी, उपविभागीय अधिकारी प्रदिप कुलकर्णी, उपजिल्हाधिकारी (रोहयो) बी. एन. कांबळे, उपजिल्हाधिकारी (पुनर्वसन) महेश वडदकर, पोलीस उपअधिक्षक व्ही. पी. नांदेडकर, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक नईम कुरेशी, शिक्षणाधिकारी (मा.) जयश्री गोरे, तहसिलदार ज्योती पवार,  तसेच विविध विभागांचे प्रमुख अधिकारी आदींची उपस्थिती होती.
स्वातंत्र्य दिन वर्धापदिन निमित्त आयोजित समारंभास शासकीय कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी यांनी मुख्यालयी उपस्थित राहणे आवश्यक आहे. त्याबाबत संबंधित विभागांनी, कार्यालय प्रमुखांनी दक्ष रहावे व  उपस्थितीबाबत सूचना द्याव्यात, असेही निर्देश जिल्हाधिकारी डोंगरे यांनी दिले.
मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभ जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात 15 ऑगस्ट रोजी सकाळी 9.05 मिनीटांनी होणार आहे. या समारंभात जास्तीत जास्त नागरिकांना सहभागी होता यावे यासाठी या दिवशी सकाळी 8.35 ते 9.35 च्या दरम्यान ध्वजारोहण किंवा इतर कोणताही शासकीय व निमशासकीय समारंभ करण्यात येऊ नये. एखाद्या कार्यालयाला अथवा संस्थेला असा ध्वजारोहण समारंभ करावयाचा असल्यास, त्यांनी तो सकाळी 8.35 वा. च्यापुर्वी किंवा 9.35 वाजेनंतर करावा. याबाबत विविध स्तरावरून माहिती देण्यात यावी असे निर्देशही बैठकीत देण्यात आले.
ध्वजारोहणाच्या समारंभाबाबत ध्वजसंहितेचे काटेकोर पालन करण्यात यावे. विद्यार्थी व नागरिकांना ध्वजासाठी प्लॅास्टीकच्या वापरावर बंदी असल्याचे निदर्शनास आणुन द्यावे. प्लॅास्टीकचे ध्वज वापरले जाणार नाहीत याची दक्षता घेण्यात यावी. राष्ट्रध्वजाचा उचीत सन्मान ही सर्वच नागरिकांची जबाबदारी आहे. त्यामुळे ध्वजसंहितेतील प्रत्येक गोष्टीचे काटेकोर पालन व्हावे याची दक्षता घ्यावी. मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभाच्या अनुषंगाने विविध विभाग प्रमुख आणि यंत्रणांना सोपवण्यात आलेल्या कामांबाबतही यावेळी आढावा घेण्यात आला. प्रभात फेऱ्या, देशभक्तीपर विविध कार्यक्रम, सांस्कृतिक उपक्रम यांच्या नियोजनाबाबतही सुचना देण्यात आल्या.
000000
  

No comments:

Post a Comment