Friday, June 9, 2017

गोदावरीचे प्रदुषण रोखण्यासाठी युद्धपातळीवर
उपाय योजना कराव्यात - पर्यावरण मंत्री कदम
नांदेड दि. 9 :- गोदावरी नदीचे प्रदुषण होऊ नये यासाठी नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेने काटेकोर नियोजन करणे आवश्यक आहे. शहरातील सांडपाणी नाल्यांद्वारे नदीत मिसळू नये यासाठी योग्य त्या उपाय योजना युद्धपातळीवर कराव्यात, असे निर्देश राज्याचे पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी आज येथे दिले.
गोदावरी प्रदुषीत केल्याबद्दल प्रसंगी महापालिकेवर कठोर कारवाईचे संकेतही श्री. कदम यांनी दिले. जिल्हास्तरीय पर्यावरण आघात मुल्यांकन प्राधिकरण तसेच जिल्हास्तरीय पर्यावरण समितीच्या कामकाजाबाबत मंत्री श्री. कदम यांनी आज आढावा घेतला. या बैठकीत ते बोलत होते. जिल्हाधिकारी कार्यालय प्रांगणातील डॉ. शंकरराव चव्हाण नियोजन भवन येथे बैठक झाली.   
बैठकीस आ. सुभाष साबणे, आ. हेमंत पाटील, अप्पर जिल्हाधिकारी संतोष पाटील, प्रभारी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुधीर भातलंवडे, निवासी उपजिल्हाधिकारी जयराज कारभारी, उपविभागीय अधिकारी प्रदीप कुलकर्णी, मनपाचे उपायुक्त रत्नाकर वाघमारे, पर्यावरण समितीचे सदस्य डॉ. अर्जुन भोसले, सुरेश जोंधळे तसेच महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी नामदेव दारसेवाड आदींची उपस्थिती होती.
बैठकीत बोलतांना श्री. कदम म्हणाले की, जिल्हा पर्यावरण समितीच्या बैठका नियमित होणे आवश्यक आहेत. या समितीच्या अध्यक्षांना दिलेल्या अधिकारांचा पुरेपुर वापर करण्यात यावा. गोदावरी नदी प्रदुषणाबाबत यापुर्वी मंत्रालयात घेण्यात आलेल्या बैठकीतील निर्देशांवर महापालिकेकडून कार्यवाही झाली नसल्याचे दिसते. गोदावरीत शहराचे सांडपाणी मिसळू नये यासाठी महापालिकेने शासन धोरणानुसार स्व:निधीतून उपाय योजना करणे आवश्यक आहे. त्यासाठी वेगळ्या तरतुदीची गरज नाही. हा खर्च पर्यावरण धोरणानुसार बंधनकारक आहे. घनकचरा विल्हेवाट लावण्याचा प्रकल्पही पुन्हा कार्यान्वीत करण्यात यावा.
यावेळी श्री. कदम यांनी महापालिकेकडून सांडपाणी तसेच घनकचरा प्रक्रियेबाबत करण्यात येणाऱ्या उपाय योजनांची माहिती घेतली. जिल्ह्यात सुरु असलेल्या स्टोन क्रशर, तसेच विविध उद्योगांकडून पर्यावरण रक्षणांच्या मानकांची काटेकोर अंमलबजावणी केली जावी यासाठी यंत्रणांनी दक्ष रहावे, असेही निर्देशीत केले. बैठकीत जिल्ह्यातील वृक्ष लागवड, तसेच पर्यावरण संवर्धनाच्या विविध बाबींचा आढावाही घेण्यात आला. यावेळी झालेल्या चर्चेत आमदार सर्वश्री पाटील, साबणे आदींनी सहभाग घेतला.  
त्यानंतर श्री. कदम यांनी गोवर्धनघाट, उर्वशीघाट येथे प्रत्यक्ष भेट देवून गोदावरी नदीत जाणाऱ्या सांडपाण्याच्या ठिकाणाची पाहणी केली. सांडपाणी नदी मिसळू नये यासाठी काटेकोर प्रयत्न करण्यात यावेत, यासाठी प्रसंगी कार्यवाहीत कुचराई करणाऱ्या यंत्रणांवर कारवाई करण्यात यावी, असे निर्देशही दिले. तुप्पा येथील घनकचरा प्रक्रिया प्रकल्पासही त्यांनी भेट दिली. तेथून उस्माननगर-शिराढोण-गळेगाव शिवारात वन विभागाच्यावतीने वृक्ष लागवड मोहिमेत करण्यात आलेल्या वृक्ष लागवडीची पाहणी करण्यासाठी श्री. कदम यांनी भेट दिली.

0000000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   401 लोकसभा निवडणुकीतील सहभागी कर्मचाऱ्यांचे यावर्षी विक्रमी मतदान   10 हजारावर  कर्मचाऱ्यांनी बजावला मताधिकार   नांदेड दि. 2 ...