Tuesday, June 13, 2017

वीज अंगावर पडू नये यासाठी काळजी घ्या  
- जिल्हाधिकारी डोंगरे
नांदेड दि. 13 :- जिल्ह्यात होणाऱ्या पावसाच्या काळात वीज कोसळुन जीवतहानी टाळण्यासाठी नागरिकांनी सतर्क रहावे. विशेषत: खरीपाच्या तयारीसाठी शेतशिवारात कामात मग्न असलेल्या शेतकरी, शेतमजुरांनी कोसळणाऱ्या वीजपासून बचावाच्या उपायांची माहिती घ्यावी व जीवतहानी टाळावी, असे आवाहन जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी केले आहे.
ढगाळ वातावरण, अवकाळी पाऊसाच्या काळात होणाऱ्या वीज कोसळण्याच्या प्रकारांपासून नागरिकांनी सतर्क राहणे आवश्यक आहे. मान्‍सून सक्रिय होण्‍याच्‍या आधी अवकाळी आणि पूर्वमोसमी पावसाच्‍या काळात विजा कोसळण्‍याचे प्रकार घडतात. पाऊस पडण्‍याच्‍या आधी आकाशात अचानक ढग जमतात आणि काही मिनिटात गडगडाटी वादळासह विजा चमकतात व मोठया आवाजासह कुठेतरी पडतात. याच कालावधीत शिवारात खरिपाची तयारी सुरु असते. त्‍यामुळे शेतात काम करीत असलेल्‍या शेतकरी, मजूर आणि पशूधनांना इजा होण्याची शक्यता वाढते. अशा परीस्थितीत उंच झाड हे कोसळणाऱ्या विजेला आकर्षित करतात त्‍यामुळे झाडाखाली आश्रय कोणत्‍याही परिस्थितीत घेवू नये. 
अवकाळी पाऊस आणि गडगडाच्या कालावधीत  कोसळणारी वीज ही उंच वस्‍तूवर, ठिकाणावर कोसळते आणि धातूच्‍या वस्‍तूवर जास्‍त आकर्षित होते. त्यामुळे अशा वातावरणात उंच ठिकाणी जाण्याचे टाळावे. तात्‍काळ मोकळया जागेवर यावे आणि दोन्‍ही पाय गुडघ्‍याजवळ घेन त्‍यांना दोन्‍ही हातानी आवळु ठेवावे तथा हनवटी जवळ घेतलेल्या गुडघ्‍यांवर टेकवावी. एकटे उभे असलेले मोठे झाड आणि टेकडी किंवा डोंगराचा माथा येथे विजा चमकत असताना आश्रय घेणे टाळावे. सगळयात जास्‍त धोका झाडाखाली थांबल्‍यामुळे उद्भवतो ज्‍यांच्‍या फांदया छोटया व दूरपर्यंत पसरलेल्‍या असतात. निर्जन ठिकाणी विखुरलेले झाडांचे समुह विजेला आकर्षित करतात.  झाडाच्‍या जवळ किंवा खाली उभे राहिल्‍यामुळे मनुष्‍याला अशा प्रकारे ईजा होण्‍याची, दगावण्‍याची शक्‍यता असते. धातुंच्‍या वस्‍तू जसे छत्री, चाकु, गोल्‍फ खेळावयाची छडी, भांडे विशेषत: हे जर का शरीराच्‍या वरच्‍या बाजुला असल्‍यास विजा चमकत असताना दूर ठेवाव्‍यात.
विद्युत सुवाहक असणा-या वस्तुंपासुन दूर रहावे. विजा चमकत असताना विद्युत प्‍लगमध्‍ये कोणत्‍याही ईलेक्ट्रॉनिक वस्‍तूची जोडणी देण्‍यात येवू नये. वीज आपल्‍या घरावर कोसळली तर त्‍यातील प्रभार प्‍लगच्‍या माध्‍यमातून विद्युत प्‍लगमध्‍ये येवू शकते. विजा चमकत असताना मोबाईल, इंटरनेट जोडणी असलेले संगणक, टिव्‍ही, दुरध्‍वनी यांचा वापर करु नये. चारचाकी वाहन हे विजेपासून सुरक्षित ठेवणारे साधन आहे. विजा कडाडत असताना वाहनातून  बाहेर येवू नये.
विजा चमकत असताना धातुंच्‍या वस्‍तू घेवून बाहेर जावू नये. जसे छत्री, धातुंची भांडी इत्‍यादी. पाण्‍यात असल्‍यास त्‍वरीत बाहेर यावे. यात जर का होडी किंवा नाव असल्‍यास त्‍यातून लवकर बाहेर पडावे. विजा चमकत असताना जर आपण बाहेर आहात तर त्‍वरीत सुरक्षित आसरा घ्‍यावा. विजा चमकत असतांना विद्युत प्रभार जाणविल्‍यास अंगावरील केस उभे राहतात किंवा त्‍वचेला मुंग्‍या, झिणझिण्‍या आल्‍यासारखे वाटते. तेंव्‍हा समजून घ्‍यावे की, वीज आपल्‍यावर पडणार आहे यावेळी त्‍वरीत जमिनीवर बसलेल्‍या मुद्रेत जावे.
इमारत सुरक्षित आसरा ठरते. जर इमारत उपलब्‍ध नसल्‍यास गुफा, कपार हे सुरक्षित ठिकाण ठरतात. सुरक्षीत आश्रय उपलब्‍ध झालेच नाही तर उंचीच्‍या वस्‍तुंखाली आश्रय घेवू नका. जर ओसाड ठिकाणी झाड आहे तर त्‍यापासून सुरक्षित अंतर ठेवून जमिनला टेकून बसा. उंच झाडांचा कदापिही आश्रय घेऊ नका, ते वीजपाताला आकर्षित करतात.

0000000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   401 लोकसभा निवडणुकीतील सहभागी कर्मचाऱ्यांचे यावर्षी विक्रमी मतदान   10 हजारावर  कर्मचाऱ्यांनी बजावला मताधिकार   नांदेड दि. 2 ...