Tuesday, September 6, 2016

मराठवाडा मुक्ती संग्राम दिन वर्धापन दिनाच्या
समारंभ पूर्वतयारीची आढावा बैठक संपन्न
नांदेड, दि. 6 :- मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचा 68 वा वर्धापन दिन समारंभ शनिवार 17 सप्टेंबर 2016 रोजी आयोजित करण्यात येणार आहे. हुतात्मा स्मृती स्तंभास मानवंदना व पुष्पचक्र अर्पण करण्याचा कार्यक्रम आणि मुख्य शासकीय ध्वजवंदन माता गुजरीजी विसावा उद्यानात होणार आहे. या समारंभासाठीची पूर्व तयारी आढावा बैठक जिल्हाधिकारी सुरेश काकाणी यांच्या अध्यक्षतेखाली आज संपन्न झाली.
जिल्हाधिकारी कार्यालय आवारातील बचत भवन येथे झालेल्या या बैठकीस पोलीस अधीक्षक संजय ऐनपुरे, अप्पर जिल्हाधिकारी  संतोष पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी जयराज कारभारी, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहुल काळभोर, जिल्हा वनसंरक्षक सुजय डोडल, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॅा. तुकाराम मोटे, जिल्हा सहकार उपनिबंधक वसंत निकम, पशूसंवर्धन उपायुक्त पी. पी. घुले, उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) श्री. कोकणे , जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक बी. यु. वाघमारे, कार्यकारी अभियंता व्ही. पी. शाहू यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी यांची उपस्थिती होती.
मुक्ती संग्राम दिनाचा हा वर्धापन दिन उत्साहात साजरा व्हावा यासाठी काटेकोर नियोजन करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी श्री. काकाणी यांनी दिले. शनिवार 17 सप्टेंबर रोजी 8.30 वा. हुतात्मा स्मृती स्तंभास पुष्पचक्र अर्पण करुन मानवंदना देण्यात येईल. त्यानंतर  सकाळी 9 वा. ध्वजवंदन होणार आहे. या मुख्‍य शासकीय ध्वजवंदन कार्यक्रमास जास्तीतजास्त नागरिकांना उपस्थित राहता यावे यासाठी इतर सर्व कार्यालय आणि संस्था यांनी त्यांचे ध्वजवंदनाचे कार्यक्रम सकाळी 8.15 पूर्वी किंवा सकाळी 9.30 नंतर आयोजित करावेत. भारतीय राष्ट्रध्वज संहितेनुसार ध्वजवंदन करण्यात यावे. तसेच राष्ट्रध्वजाच्या उचीत सन्मानाबाबतचे गृह विभागाच्या परिपत्रकानुसार प्लॉस्टिकचे ध्वज वापरले जाऊ नयेत. यासाठी सर्वच यंत्रणांनी दक्ष रहावे, अशाही सूचना बैठकीत देण्यात आल्या. मुक्ती संग्राम दिनाच्या माता गुजरीजी विसावा उद्यानातील विविध व्यवस्थांबाबत संबंधीत यंत्रणांना वेळेत कार्यवाहीचे निर्देशही या बैठकीत देण्यात आले.
मुक्ती संग्राम दिन उत्साहात साजरा करण्यात यावा. या कार्यक्रमानंतर शासनाच्या चारा टंचाई, पाणी टंचाई, रोजगार हमी योजना, जलयुक्त शिवार सारख्या विविध योजनांची उत्कृष्टरित्या अंमलबजावणी  करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांचा गौरवही करण्याचा विचार असल्याचे सांगून जिल्हाधिकारी श्री. काकाणी यांनी  शासनाच्या विविध विभागाने उत्कृष्ट काम केलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची निवड करुन ठेवावी, असे सांगितले.

00000000

No comments:

Post a Comment

वृत्‍त क्र.   384   देगलूर तहसील कार्यालयासमोरील वाहतूक वळण रस्यात बदल   नांदेड दि. 24 एप्रिल- लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या अनुषंगाने...