Thursday, September 22, 2016

राष्ट्रीय स्वच्छता मोहिम 25 सप्टेंबर ते
11 ऑक्टोबर पर्यंत राबविण्यात येणार
नांदेड, दि. 22 :- स्व. पंडित दिनदयाल उपाध्याय यांच्या 25 सप्टेंबर 2016 रोजीच्या जयंती दिनापासून 11 ऑक्टोंबर 2016 या जयप्रकाश नारायण यांच्या जयंतीदिनापर्यंत राष्ट्रीय स्वच्छता मोहिम राबविण्यात यावी असे केंद्र शासनाने कळविले आहे.
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या स्वप्नातील स्वच्छ भारताची संकल्पना साकारण्यासाठी पंतप्रधान महोदयांनी महात्मा गांधी यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त स्वच्छ भारत साकारण्यासाठी व्यापक जनचळवळ उभारण्याचे आवाहन करुन 2 ऑक्टोंबर 2014 पासून देशामध्ये स्वच्छ भारत अभियान राबविण्यास सुरुवात केली आहे. त्यास एक वर्षे पूर्ण होत असल्याच्या अनुषंगाने या अभियानांतर्गत अपेक्षित ध्येय साध्य करण्यासाठी समाजातील सर्व घटकांच्या सहभागाने लोकांच्या वर्तणुकीत चिरस्थायी बदल करण्यास्तव व्यापक जनजागृती करण्यासाठी एक राष्ट्रव्यापी मोहीम राबविण्यात येत आहे. त्यास अनुसरुन ही मोहीम राज्यातील सर्व नागरी स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये रविवार 25 सप्टेंबर ते मंगळवार 11 ऑक्टोंबर 2016 पर्यंत राबविण्यात येणार आहे.
तसेच राष्ट्रीय स्वच्छता मोहीम राबविण्यात येत असताना अभियानावर लक्ष केंद्रित करण्यासाठी वॉकेथॉन स्पर्धा, वाद-विवाद स्पर्धा, पथनाट्य, पदयात्रा, संगीत व निबंध स्पर्धा, चर्चासत्र, प्रदर्शन, स्वच्छताविषयक इतर सामुदायीक उपक्रम आयोजित करण्यात यावेत. रेडीओ, टिव्ही, वृत्तपत्रे इत्यादी जनसंपर्क माध्यमाचा इंटरनेट मोबाईल इत्यादी डिजीटल माध्यमाचा प्रभावी उपयोग करण्याबाबत सूचना निर्गमित केलेल्या आहेत.
या कार्यक्रमाचे नियोजन करण्यासाठी शासनाच्या दि. 23 सप्टेंबर 2015 रोजीच्या परिपत्रकाची प्रत महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आली असून त्याचा संकेतांक 201509231616296525 असा आहे. संबंधितांनी कार्यक्रमाचे आयोजन करुन केलेल्या कार्यवाहीचा अहवाल शासनास व जिल्हा प्रशासनाला सादर करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी नांदेड यांनी केल्या आहेत.
0000000

No comments:

Post a Comment

वृत्त क्र. 283

  वृत्त क्र.   283 निवडणूक खर्च निरीक्षक नांदेडमध्ये दाखल ; खर्चावर काटेकोर लक्ष ठेवण्याचे आवाहन नांदेड, दि. 28 : लोकसभा निवडणूक ही अतिशय गं...