Friday, November 29, 2019


पोशिंद्याच्या उभारीसाठी
जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांचा "प्रयास"
         
नांदेड,दि. 29 :- जगाचा पोशिंदा समजला जाणारा शेतकरी विविध कारणांनी विवंचनेत सापडला आहे. त्यातूनच वैफल्यग्रस्त होवून आत्महत्ये सारखे टोकाचे पाऊल उचलले जाते. आत्महत्या मागच्या कारणांची चर्चा मोठ्या प्रमाणावर होते, उपाय योजना मात्र तोकडी पडते. आत्महत्येनंतर करण्यात येणारी मदत गेलेल्या व्यक्तीची उणीव कदापी भरून काढू शकत नाही. आत्महत्या होवूच नयेत या जाणीवेतून नांदेडचे जिल्हाधिकारी अरूण डोंगरे यांनी "प्रयास" नावाने नवोपक्रम सुरू केला आहे.
गुरूवार 28 रोजी शहरातील नियोजन भवनात शेतकरी आत्महत्या रोखण्याच्या अनुषंगाने विशेष चर्चा सत्राचे आयोजन करण्यात आले होते. चार तास चाललेल्या या चर्चा सत्रात शेतकरी आत्महत्या मागची कारणे व त्या रोखण्यासाठी उपाययोजनांची सांगोपांग चर्चा करण्यात आली. यावेळी कृषि, आरोग्य, मानसशास्त्र, पोलिस प्रशासन, किर्तनकार, लोककलावंत, सेवाभावी संस्था आदी क्षेत्रातील मान्यवरांनी सहभाग नोंदवून उपाय सुचवले.
हरवत चाललेला संवाद जपावा
जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांचे आवाहन
अगदी मागच्या पिढीपर्यंत गावागावातून पार, चावडी सारख्या ठिकाणी चर्चा होत. नियमितपणे एकमेकांची ख्याली खुशाली विचारली जात असे. त्यामुळे एखाद्याच्या समस्येबाबत जेष्ठांच्या मार्गदर्शनातून लगोलग उपाय देखील निघत. अलिकडे नागरिकरणाचा वेग वाढल्यामूळे हरवत चाललेला संवाद देखील या दुर्देवी समस्येच्या मुळाशी आहे. बऱ्याचदा समस्या छोटी असते परंतू तिचा बाऊ केल्याने मोठी वाटते. अशावेळी सकारात्मक संवाद नवी उभारी देतो. त्यामुळे या चर्चासत्रातून पुढे आलेल्या उपायांची अंमलबजावणी करण्यासाठी समाजातील प्रत्येक घटकाने सामाजिक जबाबदारी म्हणून पुढे आले पाहिजे. विवंचनेत असलेल्या व्यक्तीशी संवाद साधला पाहिजे, असे आवाहन यावेळी जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी केले.
चर्चेचा सूर - आर्थिक विवंचनेसह मनो- सामाजिक न्यूनगंड
शेतकरी आत्महत्येसाठी आर्थिक अडचणीसह अन्य सामाजिक, मानसिक घटकांचाही समावेश असून अडचण सोडवण्यासाठी योग्य उपाय शोधण्याची मानसिकता निर्मितीचे वातावरण नसल्याने न्यूनगंड निर्माण होतो.
          शेतकरी बांधवाच्या अडचणी सोडवण्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत याची जाणीव अशा उपक्रमातून करणे शक्य असल्याचे मत यावेळी सहभागी विविध क्षेत्रातील तज्ञ, समाजसेवक यांच्याकडून व्यक्त करण्यात आले. विविध कल्याणकारी योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश देखील याप्रसंगी शासनाच्या खाते प्रमुखांना देण्यात आले.
यावेळी जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक काकडे, पोलिस अधिक्षक विजयकुमार मगर, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.सचिन खल्लाळ, प्रकल्प संचालक नईम कुरेशी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिक्षक रविशंकर चलवदे, आय.एम.ए चे डॉ. संजय कदम, अरविंद महाराज मोरे, भारतीय जैन संघटना, पतंजली योगपिठ, साईप्रसाद परिवार, भजनी मंडळ, महिला बचत गट यांचेसह सेवाभावी संस्थांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र. 412 पाणी टंचाईबाबतच्या अफवांवर विश्वास ठेवू नये  जिल्हा प्रशासनाचे आवाहन नांदेड (जिमाका) दि. 8 :-   सद्यस्थितीत नांदेड शहरात कु...