Tuesday, March 28, 2023

 यशकथा

 

कृषि विभागाच्या मार्गदर्शनाने अनिल इंगोले यांनी फुलविली पेरू व सिताफळाची फळबाग !

 

कोरडवाहू शेती करणे शेतकऱ्यांसाठी मोठया जिकीरीचे काम आहे. परंतु यातही सकारात्मता असेल तर काहीही अवघड नाही हे दाखवून दिले देगलूर तालुक्यातील माळेगाव मक्ता येथील अनिल हणमंतराव इंगोले या उच्च शिक्षीत शेतकऱ्यांने. 22 एकर कोरडवाहू शेती, शेतात पारंपारिक पिके घेवून पाहिलेपाहिजे तेवढे उत्पन्न मिळत नव्हते. शेतात अनेक‍ नवनवीन पिके घेवून प्रयोग करीत राहिले. मग त्यांनी कृषी विभागाचे मार्गदर्शन घेवून 22 एकर कोरडवाहू शेतात कृषी विभागाच्या भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजनेचा लाभ घेतला. तसेच एमआयडीएच योजनेच्या अनुदानातून 34 बाय 34 बाय 4.70 आकारमानाचे सामुहिक शेततळे करुन घेतले. पाणी साठ्यामुळे फळबाग क्षेत्रात वरचेवर वाढ केली. 22 एकर पैकी 20 एकरात पेरू व 2 एकरात सिताफळ टप्या-टप्याने लागवड करण्यास सुरुवात केली. या फळबाग लागवडीतून श्री.  इंगोले वर्षाला 20 लाखांचे उत्पादन घेतात. शेतीतील उत्पन्न आज मोहून टाकणारे असले तरी प्रत्यक्ष शेती करतांना खूप आव्हानाचा सामना करावा लागतो असे अनिल इंगोले यांनी सांगितले.

 

फळबाग लागवडीसोबत ते सोयाबीनचे उत्पादन घेतात. त्यांच्या फळबागेत एकूण 11 हजार पेरू व सिताफळाची झाडे आहेत. या फळबागेसाठी त्यांनी शासनाच्या भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजनेचा लाभ घेतला. या योजनेचे अर्थसहाय्य त्यांना तीन वर्षात टप्या-टप्याने मिळत आहे. यावर्षी त्यांनी 500 क्विंटल पेरूचे उत्पादन केले आहे. आजच्या घडीला त्यांचे पेरू व सिताफळे हैद्राबाद, नांदेड, अमृतसर, सोलापूर, निजामाबाद या मोठया बाजारपेठेत विक्रीसाठी जातात. उत्पादन दर्जेदार असल्यामुळे त्यांच्या पेरू व सिताफळाला खूप मोठया प्रमाणात मागणी आहे. यातून त्यांना चांगला नफा मिळतो असे श्री.  इंगोले यांनी सांगितले. पुढील वर्षात जवळपास दोन्ही हंगामात 1 हजार क्विंटल पेरूचे फळाचे उत्पादन मिळेलअसा त्यांनी विश्वास व्यक्त केला. एका एकरात 125 क्विंटल पेरूचे उत्पन्न हमखास होते. उत्पादन वाढीसाठी ते अनेक‍ प्रगतीशिल शेतकऱ्यांच्या भेटी घेतात.  त्यांच्या फळबागेत ते रासायनिक खतांचा वापर कमीतकमी करुन जास्तीतजास्त सेंद्रिय खताचा उपयोग करण्यावर भर देतात. आजूबाजूच्या परिसरातील शेतकरी त्यांच्या बहरलेल्या पेरूच्या आणि सीताफळाच्या बागेची पाहणी करण्यासाठी आणि मार्गदर्शन घेण्यासाठी भेट देतात.

 

अनिल इंगोले यांच्यासारख्या प्रगतीशिल शेतकऱ्यांना प्रोत्साहन मिळावे यासाठी महाराष्ट्र शासनाने अर्थसंकल्पात नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन दिले आहे. आगामी 3 वर्षात राज्यातील 25 लाख हेक्टर क्षेत्र सेंद्रिय शेतीखाली आणण्याचा निश्चय व्यक्त केला आहे. सुमारे 1 हजार जैवनिविष्ठा स्त्रोत केंद्रे स्थापन करुन डॉ. पंजाबराव देशमुख जैविक शेती मिशनची व्याप्ती वाढविली जाणार आहे. यासाठी तीन वर्षात 1 हजार कोटी रुपयांचा भरघोस निधी उपलब्ध केला जाणार आहे. शाश्वत शेती समृद्ध शेतकरी ही भूमिका शासनाने अधिक दृढ केली आहे. राज्यातील शेतकऱ्यांना आता 12 हजार रुपयांचा सन्मान निधी दिला जाईल. यात प्रधानमंत्री कृषि सन्मान निधी योजनेत राज्य सरकारची भर असून केंद्र सरकारचे 6 हजार आणि राज्याचे 6 हजार असे 12 हजार रुपये प्रतीवर्षी शेतकऱ्यांना मिळतील. याचा राज्यातील सुमारे 1.15 कोटी कुटूंबातील शेतकऱ्यांना लाभ होणार आहे. मागेल त्याला शेततळे या योजनेसोबतच आता मागेल त्याला फळबाग, ठिबक सिंचनशेतांचे अस्तरीकरणशेडनेटहरितगृहआधुनिक पेरणीयंत्र5 हजार गावांमध्ये जलयुक्त शिवार योजना राबविणार. गाळमुक्त धरणगाळयुक्त शिवार योजनाही राबविली जाणार आहे. 

 

 

अलका पाटील

उपसंपादक, 

जिल्हा माहिती कार्यालय,

नांदेड

 

00000






No comments:

Post a Comment

  वृत्त क्र. 412 पाणी टंचाईबाबतच्या अफवांवर विश्वास ठेवू नये  जिल्हा प्रशासनाचे आवाहन नांदेड (जिमाका) दि. 8 :-   सद्यस्थितीत नांदेड शहरात कु...