Friday, December 22, 2017

रब्बी हंगाम पाणी-पाळीसाठी
अर्ज करण्याचे आवाहन
नांदेड, दि. 22 :- सद्यस्थितीत उपलब्ध पाणीसाठ्यातून लाभक्षेत्रातील उभी हंगामी व बारमाही पिकांना संरक्षणात्मक एक पाणी-पाळी डिसेंबर 2017 अखेर देण्याचे प्रस्तावित आहे. त्यानुसार उर्ध्व पेनगंगा प्रकल्पाच्या (इसापूर धरण) लाभक्षेत्रातील बागायतदारानी नमुना 77 अमध्ये पाणी अर्ज करावीत, असे आवाहन कार्यकारी अभियंता, उर्ध्व पेनगंगा प्रकल्प विभाग क्र. 1 नांदेड यांनी केले आहे.  
            उर्ध्व पेनगंगा प्रकल्पांतर्गत इसापूर उजवा कालवा कि.मी. 119 व इसापूर डावा कालवा कि.मी. 84 पर्यंतच्या वितरण व्यवस्थेअंतर्गत लाभक्षेत्रातील सर्व लाभधारकांना, सिंचन वर्ष 2017-18 मध्ये इसापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात समाधानकारक पाऊस न झाल्याने रब्बी हंगामाच्या प्रारंभी धरणात केवळ 14 टक्के पाणीसाठा शिल्लक होता. धरणात पुरेसा पाणीसाठा नसल्यामुळे उर्ध्व पेनगंगा प्रकल्पाच्या लाभक्षेत्रात रब्बी हंगामासाठी सिंचन कार्यक्रम पुर्णपणे राबविणे शक्य होणार नाही.
खालील दर्शविलेल्या शर्तीस व शासनाच्या प्रचलीत नियमास अनुसरुन पाणी अर्जास मंजूरी देण्यात येईल. हंगामाची मुदत 15 ऑक्टोंबर 2017 ते 28 फेब्रुवारी 2018 पिकाचे नाव- उभ्या पिकांना संरक्षणात्मक पाणी पाळी. पाणी अर्जाचा विहित नमुना क्र  7 व 7 अ संबंधीत शाखा कार्यालयात विनामुल्य मिळेल. सदर पाणी अर्जात पिकाची मागणी 20 आरच्या पटीत नोंदवावी. अर्जातील पूर्ण माहिती भरुन पाणी अर्ज कार्यालयीन वेळेत शाखा कार्यालयात दाखल करुन त्याची पोंच पावती घ्यावी. पाणी अर्ज भरतेवेळेस थकबाकीदार लाभधारकांनी मागील थकबाकी व चालु पिकांची अग्रीम पाणीपट्टी भरुन सहकार्य             करावे म्हणजे दिलेला पाणी अर्ज मंजूर होईल. नियमानुसार पाणीपट्टी भरणा न केल्यास पाणी अर्ज नामंजूर होईल तेंव्हा नामंजुर क्षेत्रास कालव्याद्वारे पाणी पुरवठा करणे बंधनकारक राहणार नाही. मंजुर क्षेत्रासच कालव्याचे पाणी अग्रक्रमाणे देण्यात येईल. नामंजुर व अनधिकृत क्षेत्रास कालव्याचे पाणी देण्याची जबाबदारी पाटबंधारे विभागावर राहणार नाही तेंव्हा मंजूरी घेवुनच पिकांचे नियोजन करावे. उडाप्याचे व वितरिका, मायनरच्या टेलच्या भागातील क्षेत्रास परवानगी दिली जाणार नाही. तेंव्हा कालव्याच्या पाण्यावर विसंबुन पिके घेवु नयेत याची नोंद घ्यावी या व्यतिरिक्त टेलच्या भागात पिके घेतल्यास व पाण्याअभावी पिके वाळल्यास त्यास पाटबंधारे विभाग जबाबदार राहणार नाही.
प्रत्येक लाभधारकांनी ठरवुन दिलेल्या तारखे प्रमाणेच पिकास पाणी घ्यावे. तसेच दिवसरात्र पाणी घेणे बंधनकारक  आहे. दिवसा किंवा रात्री जेंव्हा पाणी पाळी येईल तेंव्हा पाणी घेतले नाहीतर नदी / नाल्यास पाणी वाया जाते त्यामुळे सिंचनाचा कालावधी वाढतो पर्यायाने पाणी पाळी अंतरात वाढ होते. त्यामुळे असे पाणी वाया गेल्यास ठरावीक मुदतीत पाणी देणे शक्य होणार नाही व त्याची जबाबदारी या कार्यालयावर राहणार नाही याची सर्व लाभधारकांनी नोंद घ्यावी. सिंचन करतेवेळी मंजूर क्षेत्राचा पास जवळ ठेवावा. कमी पाण्यात व कमी वेळात सिंचन करुन राष्ट्रीय जलसंपत्तीचा काटेकोरपणे वापर करावा. पाणी नाश कटाक्षाने टाळावा.
नैसर्गीक आपत्ती व काही अपरिहार्य कारणास्तव किंवा तांत्रिक कारणास्तव पाणी पुरवठा करणे शक्य न झाल्यास व त्यामुळे पिकाचे नुकसान झाल्यास त्याची जबाबदारी पाटबंधारे विभागावर राहणार नाही. तसेच महाराष्ट्र पाटबंधारे प्रचलीत नियमानुसार शर्ती व अटीचे उल्लंघन झाल्यास लाभधारकास अगाऊ सुचना न देता दिलेली मंजुरी रद्द करण्यात येईल व पाणी पुरवठा बंद करण्यात येईल. सिंचन नियमांचे पालन करणे प्रत्येक लाभधारकास बंधनकारक राहील. नियमाचे उल्लंघन केल्यास  संबंधीतावर शासन नियमाप्रमाणे कार्यवाही करण्यात येईल. पाणी वापर संस्थानी पाणी पाळीतच संस्थेचे क्षेत्र भिजवुन घ्यावे, असेही आवाहन नांदेडचे उर्ध्व पेनगंगा प्रकल्प विभागाचे कार्यकारी अभियंता यांनी केले आहे.  

000000

No comments:

Post a Comment

वृत्त क्र.   407 लोहा विधानसभा मतदारसंघामध्ये मतदान केंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश  नांदेड दि. ४ मे :- लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 प्र...