Tuesday, January 7, 2020


महारेशीम अभियानाचे उद्घाटन
शेतकऱ्यांनी रेशीम शेतीचा लाभ घ्यावा
- जिल्हाधिकारी अरुण डोंगरे

नांदेड, दि. 7 :- ऋतूचक्रात अचानक व  अनपेक्षित होणा-या बदलांमुळे पारंपारिक शेतीतून निश्चित उत्पन्नाची हमी देणे कठिण झाले आहे. अशा परिस्थितीत रेशीम शेतीतून आर्थिक स्थैर्य प्राप्त होण्यास मदत होईल,त्यामुळे शेतक-यांनी पुरक व्यवसाय म्हणुन रेशीम शेतीकडे वळावे असे आवाहन जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी केले.ते जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात आयोजित रेशीम अभियान उद्घाटन प्रसंगी बोलत होते.
शासनाच्या वस्त्रोद्योग व रेशीम संचालनालयाच्या अंतर्गत रेशीम शेती बाबत जागृती करण्यासाठी जिल्हा रेशीम कार्यालयाच्यावतीने सोमवार 7 ते 21 जानेवारी या कालावधीत जिल्ह्यात महा रेशीम अभियान राबविण्यात येत आहे. यासाठी माहितीने सुसज्ज रेशीम रथ तयार करण्यात आला आहे. रेशीम शेती विषयी सर्वसामान्य शेतकऱ्यांना  माहिती होण्यासाठी रेशीम रथा सोबत रेशीम अधिकारी, तज्ञ कर्मचारी  विविध गावात जावुन मार्गदर्शन करणार आहेत.
सोमवार 7 जानेवारी रोजी जिल्हाधिकारी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात रेशीम रथास हिरवी झंडी दाखवून अभियानाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी उपजिल्हाधिकारी  रोहयो सदाशिव पडदुने, जिल्हाअधिक्षक कृषी अधिकारी आर. बी. चलवदे, रेशीम विकास अधिकारी श्रीमती ए.व्ही. वाकूरे, नायब तहसिलदार रोहयो सुनिल माचेवाड, नितेशकुमार बोलेलु, सहाय्यक कार्यक्रम अधिकारी प्रसाद डूबूकवाड, वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक  पी. बी. नरवाडे, तांत्रिक सहायक इंगळे, शुभांगी साबळे, टि.ए.पठाण, एस.जी.हनवते, पी.यु.भंडारे, तांत्रिक सहायक मनरेगा एन वाय कोरके ए एन कुलकर्णी, एस ए बोडके, के. के. मेहकरकर गणेश नरहिरे, बालाजी पांचाळ, शेषराव पाटील, रावसाहेब पोहरे, बालासाहेब भराडे, रेशिम लागवड केलेले प्रगतिशिल शेतकरी हरिभाउ पगडे, संजय पगडे, अर्जून पगडे, गंगाप्रसाद जाधव, काकडे, बोकारे आदि उपस्थित होते.
       यावेळी पुढे बोलतांना  अभियान काळात जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतक-यांना सहभागी करुन घेवुन रेशीम शेती तसेच मनरेगा सारख्या अनुषंगिक योजना शेवटच्या पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहचवण्याचे निर्देश संबंधिताना दिले.
रेशीम शेतीत कामाची मजुरी देणार शासन
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत पात्र लाभर्थ्यांना  तुती लागवड व जोपासना मजूरी व साहित्य खर्चा पोटी तीन वर्षात टप्पेनिहाय  दोन लक्ष रुपये तर किटक संगोपन ग़ृह बांधण्यासाठी पंच्यान्नव हजार रुपयांचे अनुदान देण्यात येते.
येथे मिळेल माहिती
 या योजनेत सहभागी होण्यासाठी जिल्हा रेशीम कार्यालय नवा मोंढा नांदेड येथे नोंदणी करावी अथवा ०२४६२-२८४२९१  या दुरध्वनी क्र्मांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
00000











No comments:

Post a Comment