Thursday, August 21, 2025

 वृत्त क्रमांक 892 

महाराष्ट्र विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेता अंबादास दानवे यांचा दौरा 

नांदेड, दि. 21 ऑगस्ट : महाराष्ट्र विधान परिषदेचे विरोधी पक्षनेता अंबादास दानवे हे शुक्रवार 22 ऑगस्ट रोजी नांदेड जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे राहील.  

 शुक्रवार 22 ऑगस्ट 2025 रोजी हिंगोली जिल्ह्यातील गंगापुर ता. कळमनुरी येथून निघून सकाळी 11 वा. मुखेड तालुक्यातील मुक्रमाबाद येथे पुरग्रस्त भागाची पाहणी व भेट. सकाळी 11.30 वा. मुक्रमाबाद येथून मुखेड तालुक्यातील हसनाळाकडे प्रयाण. दुपारी 12.15 वा. हसनाळा येथे पुरग्रस्त भागाची पाहणी व भेट. दुपारी 12.45 वा. हसनाळा येथून मोटारीने अर्धापूर मार्गे समृद्धी महामार्गाने छत्रपती संभाजीनगरकडे प्रयाण करतील.

00000

 

वृत्त क्रमांक 891

ओबीसी महामंडळातील कर्जाची एकरकमी परतफेड 

करणाऱ्या लाभार्थ्यांना थकीत व्याजात 50 टक्के सवलत

नांदेड, दि. 21 ऑगस्ट : महाराष्ट्र राज्य इतर मागास वर्गीय वित्त आणि विकास महामंडळाच्या संपूर्ण थकीत कर्ज प्रकरणात संपूर्ण थकीत कर्ज रक्कमेचा एकरकमी भरणा करणाऱ्या लाभार्थ्यास थकीत व्याज रक्कमेत 50 टक्के सवलत (OTS) देण्याबाबतची सुधारीत एकरकमी योजना 31 मार्च 2026 पर्यंत लागू करण्यात येत आहे. त्यानुसार थकबाकीदार लाभार्थ्यांनी या योजनेचा लाभ घेऊन कर्ज मुक्त व्हावे, असे आवाहन महाराष्ट्र राज्य इतर मागास वर्गीय वित्त आणि विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक एस. एन. झुंजारे यांनी केले आहे. अधिक माहिती व संपर्कसाठी पत्ता जिल्हा कार्यालय डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, ग्यानमाता शाळेसमोर नांदेड 431605 (02462) 220865 हा आहे. 

00000

वृत्त क्रमांक 890

राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडाळाच्या

योजनेच्या लाभासाठी महामंडळाच्या ऑनलाईन नोंदणी सुरू  

नांदेड, दि. 21 ऑगस्ट : राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ यांच्यामार्फत 13 उपकंपन्याची स्थापना शासनाने केली असून सदर उपकंपन्याचे कामकाज या महामंडळामार्फत सुरू करण्यात आले आहे. महामंडळाच्या विविध योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र लाभार्थ्यांनी महामंडळाच्या वेबसाईडवर ऑनलाईन नोदणी करावी, असे आवाहन महामंडळाचे जिल्हाव्यवस्थापक यांनी केले आहे. 

महामंडळ राबवित असलेल्या 6 योजना आहेत. त्यापैकी दोन योजना ऑफलाईन असून त्यांचे अर्ज जिल्हा कार्यालयात उपलब्ध आहेत. 1 लाखापर्यतची थेट कर्ज योजना व 20 टक्के बीज भांडवल कर्ज योजना तसेच ऑनलाईन योजना 4 आहेत. 

या योजनेत वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना, गट कर्ज व्याज परतावा योजना, शैक्षणिक कर्ज व्याज परतावा योजना, महिला स्वयंसिद्धी व्याज परतावा योजना, सदर कर्ज योजना या बँकेमार्फत राबविल्या जातात. या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्याने महामंडळाच्या वेबसाईडवर ऑनलाईन अर्ज www.msobcfdc.org या संकेतस्थळावर भरावा. अधिक माहितीसाठी महामंडळाच्या जिल्हा कार्यालयात महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ मर्या. जिल्हा कार्यालय डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन ज्ञान माता शाळेसमोर नांदेड फोन न. 02462-220865 येथे संपर्क साधावा असेही आवाहन महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक यांनी केले आहे.

00000

वृत्त क्रमांक 889

मुखेड येथील न्यायालयाच्या नूतन इमारतीचे रविवारी उद्घाटन

नांदेड, दि. 21 ऑगस्ट : मुखेड येथील न्यायालयीन संकुलाच्या नूतन इमारतीचे उद्घाटन रविवार 24 ऑगस्ट 2025 रोजी होणार आहे. मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती संदिपकुमार सी. मोरे, मुंबई खंडपीठ औरंगाबाद यांच्या हस्ते होणार आहे.

या कार्यक्रमास उच्च न्यायालय, मुंबई खंडपीठ औरंगाबादचे न्यायमूर्ती नीरज धोटे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. हा कार्यक्रम प्रमुख जिल्हा न्यायाधीश सुनिल गं. वेदपाठक यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित केला आहे, असे प्रबंधक जिल्हा न्यायालय नांदेड यांनी कळविले आहे.

00000

वृत्त क्रमांक 888

राज्य आपत्ती प्रतिसाद दलाचे काम अतुलनीय जिल्हाधिकाऱ्यांनी मानले आभार 

नांदेड दि.२१ ऑगस्ट:- जिल्ह्यातील मुखेड तालुक्यात मोठ्या प्रमाणावर पाऊस व अतिवृष्टी झाल्याने काही गावात पूरस्थिती निर्माण झाली होती. या ठिकाणी मदत व बचाव करण्यासाठी नांदेड येथे मागील दोन महिन्यांपासून तैनात असलेली राज्य आपत्ती प्रतिसाद दलाची तुकडी जिल्हाप्रशासनाने तातडीने पाठविली. बचाव कार्य पूर्ण झाल्यानंतर आज जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी या राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या तुकडीचे कृतज्ञता व्यक्त करून आभार मानले.

मुखेड तालुक्यातील 17 व 18 ऑगस्ट रोजी मोठ्या प्रमाणावर पाऊस व अनेक मंडळात अतिवृष्टी झाली होती. दि. १८ ऑगस्ट २०२५ रोजी मुखेड तालुक्यातील बाऱ्हाळी मंडळात ३५४.७५ मिमी व मुक्रामाबाद मंडळात २०६.७५ मिमी पावसाची नोंद झाली. त्यामुळे हसनाळ, रावणगाव, भासवाडी व भिंगोली या गावात पूरस्थिती निर्माण होऊन मोठ्या प्रमाणावर ग्रामस्थ अडकून पडले होते.

दि. १८ ऑगस्ट २०२५ रोजी पहाटे ०२:३० वाजता हसनाळ व रावणगावमध्ये गावात पावसाचे पाणी घुसले असल्याबाबत ग्रामस्थांनी जिल्हा आपत्कालीन कार्यकेंद्रास कळविले होते. त्यावेळी जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांनी पूरपरिस्थिती असलेल्या गावांमध्ये राज्य आपत्ती प्रतिसाद दलाची टीम पाठविली. पहाटे ०३ वाजता राज्य आपत्ती प्रतिसाद दलाची टीम नांदेडहून निघून सकाळी पाच वाजता घटनास्थळी पोचली. पहाटे पाच वाजल्यापासूनच या तुकडीने बचाव कार्यास सुरूवात केली. या तुकडीने रावणगाव येथील २७१, हसनाळ येथील ३०, भासवाडी येथील ४० व भिंगोली येथील ४५ असे एकूण ३८६ लोकांना बोटीच्या सहाय्याने सुरक्षित ठिकाणी हलविले. त्यामुळे आणखी मोठी हानी टाळणे शक्य झाले. तसेच या तुकडीला हसनाळमध्ये पुराच्या पाण्यामधून तीन महिलांचे मृतदेह काढण्यात यश आले. या तुकडीमुळे आपत्तीचा प्रभावीपणे सामना करण्यासाठी जिल्हा प्रशासनास मोठी मदत झाली. आज गुरुवार 21 ऑगस्ट रोजी दुपारी जिल्हाधिकारी राहूल कर्डीले यांनी ही तुकडी तैनात असलेल्या जिल्हा क्रीडा संकुल येथे जाऊन तुकडीतील सर्व अधिकारी व जवान यांच्याशी संवाद साधला. तसेच या बचाव कार्यात जखमी झालेल्या ८ जवानांची विचारपूस केली. या प्रसंगी बोलताना “अशा प्रकारे जीवावर उदार होऊन कमीत कमी वेळात एवढ्या मोठ्या प्रमाणात लोकांचे प्राण वाचविण्याचे अतुलनीय आपल्या तुकडीने केले असून आपल्या कामाचे कौतुक शब्दात व्यक्त करणे शक्य नाही” असे उद्गार जिल्हाधिकारी राहूल कर्डीले यांनी काढले व केलेल्या कामाबद्दल त्यांनी राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या तुकडीचे आभार मानले. 

याप्रसंगी राज्य आपत्ती प्रतिसाद दलाचे पोलीस उपनिरीक्षक शंकर उकंडे, पोलीस उपनिरीक्षक सुधीर शिरसाट, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी किशोर कुऱ्हे पाटील, जिल्हा क्रीडा अधिकारी जयकुमार टेंभारे, जिल्हा आपत्कालीन कार्यकेंद्राचे बारकुजी मोरे, कोमल नागरगोजे हे उपस्थित होते.

०००००००






 वृत्त क्रमांक 887

अतिवृष्टी व पूर परिस्थितीमुळे उद्भवलेल्या आपत्कालीन

परिस्थितीमध्ये योग्य प्रकारे व्यवस्थापन करण्याबाबतच्या सूचना निर्गमित

नांदेड, दि. 21 ऑगस्ट : दिनांक 14, 15, 16, 17 व 18 ऑगस्ट 2025 रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे नांदेड जिल्ह्यातील बहुतांश तालुक्यांमध्ये आपत्कालीन परिस्थिती निर्माण झालेली आहे. या अनुषंगाने वेळोवेळी जिल्हा प्रशासन व जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांच्यामार्फत सूचना निर्गमित करण्यात आलेल्या आहेत. या व्यतिरिक्त या आपत्कालीन परिस्थितीचे व्यवस्थापन करण्यासाठी खालील महत्त्वाच्या सूचना निर्गमित करण्यात आल्या आहेत. तरी संबधित यंत्रणानी यांची नोंद घ्यावी, असे निर्देश जिल्हा प्रशासनाच्यावतीने दिले आहेत.

जीवितहानी टाळण्याकरिता उपाययोजना

पूर परिस्थिती अतिवृष्टी किंवा इतर कुठल्याही नैसर्गिक आपत्तीमध्ये जीवितहानी होणार नाही याची पूर्ण दक्षता प्रशासनाने व क्षेत्रीय यंत्रणेने घ्यायची आहे. त्याअनुषंगाने येणाऱ्या आपत्ती बाबत मिळालेली अधिकृत सूचना ही लोकांपर्यंत पोहोचवणे गरजेचे आहे याबाबत सर्व क्षेत्रीय यंत्रणांनी सतर्क रहावे.

आवश्यक त्यावेळी ज्या क्षेत्रात नागरिकांना धोका जास्त संभवतो अशा ठिकाणाहून नागरिकांचे स्थलांतर हे सुरक्षित ठिकाणी करणे आवश्यक ठरते याचे योग्य पद्धतीने नियोजन करावे. नागरिकांना योग्य पद्धतीने माहिती देऊन स्थलांतर करावे. स्थलांतर ज्या ठिकाणी होते ते ठिकाण सुस्थितीत असल्याची दक्षता घ्यावी तसेच स्थलांतराच्या ठिकाणी जेवण, पाणी व इतर व्यवस्था योग्य पद्धतीने करण्याची दक्षता घ्यावी.

पडझड झालेल्या घरांमध्ये जे नागरिक रहिवास करत असतील त्यांच्या जीवितास धोका संभवतो त्यामुळे अशा नागरिकांना सुद्धा सुरक्षित ठिकाणीच हलवून त्याठिकाणी त्यांची पूर्ण व्यवस्था करण्यात यावी. त्याचबरोबर पावसाचे किंवा पुराचे पाणी ओसरल्यावर आणि ऊन पडल्यावर घरांना भेगा पडून कच्ची घरे पडण्याची दाट संभावना असते अशा घरांवरही विशेष लक्ष देऊन त्या ठिकाणी धोकादायक घरांमध्ये कुणी राहणार नाही याची दक्षता घ्यावी.

बाधित क्षेत्रामधील स्वच्छता व आरोग्य राखणेबाबत

पूर किंवा अतिवृष्टी सारख्या नैसर्गिक आपत्तीनंतर अस्वच्छतेमुळे मोठ्या प्रमाणावर रोगराई पसरण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे सर्वप्रथम बाधित क्षेत्रामधील गाळ, जमा झालेला कचरा, मलबा इत्यादी बाबींची स्वच्छता करण्यात यावी यासाठी आवश्यक असल्यास टँकर किंवा अग्निशमन यंत्रांचा वापर करावा.

पूर किंवा अतिवृष्टी सारख्या नैसर्गिक आपत्तीनंतर पाणी दूषित होऊन जलजन्य आजार पसरण्याची शक्यता ही दाट असते. त्यामुळे पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत दूषित होणार नाही याची दक्षता घ्यावी. जर पावसाच्या पाण्यामुळे किंवा पुराच्या पाण्यामुळे हे स्त्रोत दूषित झाले असतील तर तातडीने स्वच्छ पिण्याच्या पाण्यासाठी पर्यायी व्यवस्था करावी पाणी ओसरल्यानंतर गावातील सगळ्या पाण्याच्या स्त्रोतांचे शुद्धीकरण करून घ्यावे.

कीटकजन्य आजार पसरू नये यासाठी गावात कुठे पाणी साचलेले राहणार नाही याची दक्षता घ्यावी त्याचबरोबर फॉगिंगडस्टिंग करून कीटकजन्य आजार टाळण्यासाठी उपाययोजना करावी.

गावात जर मृत जनावरे वाहून आली असतील तर तातडीने त्यांचे शवविच्छेदन करून शास्त्रशुध्द पद्धतीने त्यांची विल्हेवाट लावावी कुठल्याही प्रकारे मृत जनावरे गावात पडून राहतील, असे होऊ नये याबाबतची योग्य दक्षता ही घ्यायची आहे.

मूलभूत सुविधांच्या पुनर्स्थापना

अनेक गावांचा संपर्क पुराच्या किंवा अतिवृष्टीच्या पाण्यामुळे हा तुटलेला आहे या ठिकाणी तातडीने रस्त्यांचे किंवा पुलांच्या डागडुजीचे काम करून हा संपर्क पुनर्स्थापित होईल या दृष्टीने सर्व संबंधित यंत्रणा जसे राष्ट्रीय महामार्ग, सार्वजनिक बांधकाम विभाग सर्व विभाग, जिल्हा परिषद बांधकाम विभाग या सर्वांनी आणि मुख्यमंत्री ग्रामसडक योजना विभाग या सगळ्यांनी उपायोजना करायची आहे.

विजेचे पोल पडल्यामुळे व लाईन्सचे नुकसान झाल्यामुळे वीजपुरवठा सुद्धा अनेक ठिकाणी खंडित झाला आहे विजेच्या बाबतीत पूर्ण काळजी घेऊन महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीने वीजपुरवठा लवकरात लवकर पुनर्स्थापित होईल याची दक्षता घ्यायची आहे. पाणी पुरवठा योजना जर अतिवृष्टी किंवा पुरामुळे बंद पडल्या असतील तर त्यांची दुरुस्ती करून शुद्ध पाणीपुरवठा योजनेच्या माध्यमातून लवकर सुरू करण्याची दक्षता पाणीपुरवठा विभाग जिल्हा परिषद किंवा महाराष्ट्र जीवन प्राधिकरणयांनी घ्यायची आहे. जलसंधारण विभाग राज्यस्तर आणि जिल्हा परिषद लघुपाटबंधारे विभाग यांच्या अनेक तलाव व जलसंधारण स्ट्रक्चर्स यांचे नुकसान झाले असेल तर त्याची डागडूजीकरून त्यातून कुठलेही मोठे नुकसान होणार नाही अशी उपाय योजना संबंधित विभागांनी तातडीने करायची आहे.

झालेल्या नुकसानाची पाहणी व पंचनामे

गेल्या पाच दिवसांमध्ये जिल्ह्यात उद्भवलेल्या आपत्कालीन परिस्थितीमुळे शेतपिकांचे नुकसान, शेती खरडून गेल्यामुळे झालेले नुकसान त्याचप्रमाणे पशुधनाचे नुकसान हे मोठ्या प्रमाणावर झाले आहे अनेक ठिकाणी अतिवृष्टी व पुराच्या पाण्यामुळे घरांची मोठ्या प्रमाणावर पडझड झाली आहे व इतरही आस्थापनांचे नुकसान झालेले आहे या सगळ्यांची तातडीने पाहणी करून त्याचा अहवाल अनुदान मागणी सहित लवकरात लवकर संबंधित यंत्रणेने सादर करायचा आहे.

आपत्ती व्यवस्थापनातील संस्थात्मक बाबी 

जिल्ह्यामध्ये राज्य आपत्ती प्रतिसाद दलाची (SDRF)एक तुकडी तैनात झालेली आहे. त्याचप्रमाणे पोलीस विभागाचे शीघ्र प्रतिसाद दल (QRT), मनपाचे प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन केंद्र व महाराष्ट्र अग्निशमन सेवा हे जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापनाचे काम करत असतात. संबंधित यंत्रणांनीया सर्व तुकड्यांना आपत्तीचे नियोजन करण्यासाठी तत्पर ठेवायचे आहे जेणेकरून कमीत कमी वेळेमध्ये आलेल्या आपत्तीला प्रतिसाद देता येईल.

सर्व शासकीयकार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांनी आपल्याला नेमून दिलेली जबाबदारीचे अतिशय काटेकोरपणे नियोजन करणे हे आपत्कालीन परिस्थितीमध्ये अपेक्षित आहे त्या अनुषंगाने विभाग प्रमुखांनी सूचना निर्गमित कराव्यात. 

प्रत्येक गावाच्या स्तरावर ग्राम आपत्ती व्यवस्थापन समिती ही स्थापित झालेली आहे या समितीच्या बैठका घेऊन त्या माध्यमातून आपत्ती व्यवस्थापनाच्या कामास गती द्यावी. गेल्या पाच दिवसात झालेल्या आपत्तीमुळे जर गाव आपत्ती व्यवस्थापन आराखडा यात बदल करायचा असेल तर त्या अनुषंगाने तातडीने तो बदल करून सगळे गाव आपत्ती व्यवस्थापन आराखडे हे अद्यावत करावेत.

आपत्ती व्यवस्थापनाच्या कामांमध्ये लोकप्रतिनिधी, एनजीओ NGO’s, समाजसेवी संस्था, सीएसआर या सर्वांशी समन्वय साधने आवश्यक आहे जेणेकरून आपत्ती व्यवस्थापनाचे काम अधिक प्रभावीपणे करता येईल आपत्ती व्यवस्थापनामध्ये लोकसहभाग मिळाल्यास अधिक तातडीने प्रतिसाद देता येतो त्या अनुषंगाने संबंधित यंत्रणांनी लोकांना सोबत घेऊन व विश्वासात घेऊन उपाययोजना कराव्यात, असे जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, नांदेड यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

00000

वृत्त क्रमांक 886

महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य प्रा. मच्छिद्रनाथ तांबे,

प्रा. डॉ. गोविंद काळे व डॉ. मारुती शिकारे यांचा दौरा 

नांदेड, दि. 21 ऑगस्ट : महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य प्रा. मच्छिद्रनाथ तांबे, प्रा. डॉ. गोविंद काळे व डॉ. मारुती शिकारे हे 24 व 25 ऑगस्ट 2025 या कालावधीत नांदेड जिल्ह्यातील गवंडी, बेलदार या जाती संदर्भात बैठक, सुनावनी कामकाजासाठी तर सदस्य डॉ. गोविंद काळे हे 26 ऑगस्ट 2025 रोजी लातूर जिल्ह्यातील गवंडी, बेलदार जाती संदर्भातील सुनावनीसाठी येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. 

रविवार 24 ऑगस्ट 2025 रोजी सायं 6 वा. खाजगी वाहनाने शासकीय विश्रामगृह, नांदेड येथे आगमन व मुक्काम. सोमवार 25 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 11.30 ते 12.30 या वेळेत दि.1 जुलै 2024 ते 30 जून 2025 या कालावधीमधील इतर मागासवर्ग, विशेष मागासवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती संवर्गास वितरीत केलेली जात प्रमाणपत्रे व जात वैधता प्रमाणपत्र यांचा आढावा तसेच जिल्ह्यातील आश्रमशाळांचा  आढावा. स्थळ: जिल्हाधिकारी कार्यालय, नांदेड. दुपारी 12.30 ते 1.30 या कालावधीत नांदेड जिल्ह्यातील गवंडी/बेलदार या जात समुहांच्या प्रतिनिधीशी चर्चा व सुनावनी. दुपारी 1.30 वा. भोजन. दुपारी 2 ते सायं. 6 वाजता बेलदार, गवंडी जात समुहाची क्षेत्रपाहणी. सायं. 7 वा. शासकीय विश्रामगृह नांदेड येथे आगमन व मुक्काम. 

00000

वृत्त क्रमांक 885

राज्य महोत्सवांतर्गत महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धेचे आयोजन

अधिकाधिक मंडळांनी सहभागी होण्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री अॅड. आशिष शेलार यांचे आवाहन

                                                                                                                                                                        नांदेड, दि. 21 ऑगस्ट : राज्यात साजरा होणारा गणेशोत्सव हा राज्य महोत्सव म्हणून साजरा करण्यात येणार असल्याची घोषणा राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री अँड. आशिष शेलार यांनी केली. या महोत्सवांतर्गत, महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा राज्य, जिल्हा, तालुका या तीनहीस्तरांवर होणार आहे. या स्पर्धेचे अर्ज पु.ल.देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी मुंबईच्या pldeshpandekalaacademy.org या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेल्या ganeshotsav.pldmka.co.in या पोर्टलद्वारे ऑनलाइन स्वरूपात स्वीकारले जाणार आहेत. स्पर्धेचे अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख २५ ऑगस्ट २०२५ असून, ही स्पर्धा विनामूल्य आहे. नोंदणीकृत व परवानाधारक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ या स्पर्धेत सहभागी होऊ शकतात.

विजेत्या मंडळांना तालुकास्तरावर एक, जिल्हा व राज्यस्तरावर प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकांनी गौरविले जाणार आहे. यासोबतच, महाराष्ट्रातील घरगुती गणपतीचे दर्शन, सार्वजनिक गणपतीचे दर्शन व विविध प्रसिद्ध गणेश मंदिरातील गणपतींचे लाईव्ह दर्शन अकादमीच्या वतीने तयार करण्यात आलेल्या ganeshotsav.pldmka.co.in पोर्टलद्वारे घरबसल्या घेता येणार आहे. आपल्या घरगुती अथवा सार्वजनिक गणेशोत्सवाचे छायाचित्र या पोर्टलद्वारे विनामूल्य प्रसिद्ध करता येईल. याकरिता अधिकाधिक मंडळांनी व कुटुंबांनी आपल्या गणपतीची छायाचित्रे ganeshotsav.pldmka.co.in या पोर्टलद्वारे प्रसिद्ध करावी व सर्वांना श्री गणरायाचे दर्शन घेता यावे असे आवाहन सांस्कृतिक कार्यमंत्री अँड. आशिष शेलार यांनी केले आहे.

विविध स्पर्धा, सांस्कृतिक उपक्रम, गड किल्ले संवर्धन, राज्य व राष्ट्रीय स्मारकांचे जतन, विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन, देशी खेळांचे संवर्धन व प्रचार प्रसार, आरोग्य शिक्षण कला क्रीडा, सांस्कृतिक अशा विविध विषयांवरील कार्य, कायमस्वरूपी सामाजिक व शैक्षणिक उपक्रम, वाचनालय, महिला सक्षमीकरण, आधुनिक तंत्रज्ञानाच्या विज्ञानाच्या प्रचार व प्रसिद्धीचे कार्य, नवसंशोधन, पर्यावरण पूरक मूर्ती, सजावट व प्रदूषण रहित वातावरण अशा विविध बाबींच्या आधारे परीक्षण केले जाणार आहे.

या गणेशोत्सव स्पर्धेत अधिकाधिक संख्येने सहभागी होण्याचे आवाहन सांस्कृतिक कार्यमंत्री अँड. आशिष शेलार यांनी केले आहे

00000

वृत्त क्रमांक 884

पालकमंत्री अतुल सावे यांच्याकडून पूरग्रस्तांसाठी तातडीने मदत साहित्य उपलब्ध

नांदेड दि. 21 ऑगस्ट :  जिल्ह्यातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे यांनी तातडीने औषधे व जीवनोपयोगी साहित्य उपलब्ध करून दिले आहे. शासनासह विविध सामाजिक संस्थांच्यावतीनेही मदतीचा ओघ पूरग्रस्त गावातील नागरिकांसाठी सुरू आहे. 

मुखेड तालुक्यातील लेंडी धरणाच्या प्रभाव क्षेत्रात झालेल्या अतिवृष्टीमुळे मुक्रमाबाद, हसनाळ, रावणगाव, भिंगोली, भासवाडी या गावांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली होती. या पुराच्या पाण्याच्या प्रचंड प्रवाहामुळे नागरिकांच्या घरात पाणी शिरून जीवनावश्यक वस्तू व साहित्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

दरम्यान, पालकमंत्री अतुल सावे यांनी पूर परिस्थितीची तातडीने दखल घेऊन पूरग्रस्तांसाठी मदत साहित्य उपलब्ध करून दिले आहे. हे साहित्य देगलूरचे उपविभागीय अधिकारी व मुखेडचे तहसीलदार यांना वितरणासाठी सुपूर्द केले असून, त्यांच्यावतीने पूरग्रस्तगावांमध्ये या साहित्याचे वितरण करण्यात येत आहे. या साहित्यात प्रामुख्याने दैनंदिन वापरातील कपडे साडी, टीशर्ट, ट्रॅकपँट, टॉवेल, आणि जीवनावश्यक औषधे पॅरासीटामॉल टेबलेट स्ट्रिप, ओआरएस इ. साहित्याचा यामध्ये समावेश आहे.

०००००







वृत्त क्रमांक 883

राज्य महोत्सवांतर्गत महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धेचे आयोजन

अधिकाधिक मंडळांनी सहभागी होण्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री अॅड. आशिष शेलार यांचे आवाहन

नांदेड, दि. 21 ऑगस्ट : राज्यात साजरा होणारा गणेशोत्सव हा राज्य महोत्सव म्हणून साजरा करण्यात येणार असल्याची घोषणा राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री अँड. आशिष शेलार यांनी केली. या महोत्सवांतर्गत, महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा राज्य, जिल्हा, तालुका या तीनहीस्तरांवर होणार आहे. या स्पर्धेचे अर्ज पु.ल.देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी मुंबईच्या pldeshpandekalaacademy.org या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेल्या ganeshotsav.pldmka.co.in या पोर्टलद्वारे ऑनलाइन स्वरूपात स्वीकारले जाणार आहेत. स्पर्धेचे अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख २५ ऑगस्ट २०२५ असून, ही स्पर्धा विनामूल्य आहे. नोंदणीकृत व परवानाधारक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ या स्पर्धेत सहभागी होऊ शकतात.

विजेत्या मंडळांना तालुकास्तरावर एक, जिल्हा व राज्यस्तरावर प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकांनी गौरविले जाणार आहे. यासोबतच, महाराष्ट्रातील घरगुती गणपतीचे दर्शन, सार्वजनिक गणपतीचे दर्शन व विविध प्रसिद्ध गणेश मंदिरातील गणपतींचे लाईव्ह दर्शन अकादमीच्या वतीने तयार करण्यात आलेल्या ganeshotsav.pldmka.co.in पोर्टलद्वारे घरबसल्या घेता येणार आहे. आपल्या घरगुती अथवा सार्वजनिक गणेशोत्सवाचे छायाचित्र या पोर्टलद्वारे विनामूल्य प्रसिद्ध करता येईल. याकरिता अधिकाधिक मंडळांनी व कुटुंबांनी आपल्या गणपतीची छायाचित्रे ganeshotsav.pldmka.co.in या पोर्टलद्वारे प्रसिद्ध करावी व सर्वांना श्री गणरायाचे दर्शन घेता यावे असे आवाहन सांस्कृतिक कार्यमंत्री अँड. आशिष शेलार यांनी केले आहे.

विविध स्पर्धा, सांस्कृतिक उपक्रम, गड किल्ले संवर्धन, राज्य व राष्ट्रीय स्मारकांचे जतन, विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन, देशी खेळांचे संवर्धन व प्रचार प्रसार, आरोग्य शिक्षण कला क्रीडा, सांस्कृतिक अशा विविध विषयांवरील कार्य, कायमस्वरूपी सामाजिक व शैक्षणिक उपक्रम, वाचनालय, महिला सक्षमीकरण, आधुनिक तंत्रज्ञानाच्या विज्ञानाच्या प्रचार व प्रसिद्धीचे कार्य, नवसंशोधन, पर्यावरण पूरक मूर्ती, सजावट व प्रदूषण रहित वातावरण अशा विविध बाबींच्या आधारे परीक्षण केले जाणार आहे.

या गणेशोत्सव स्पर्धेत अधिकाधिक संख्येने सहभागी होण्याचे आवाहन सांस्कृतिक कार्यमंत्री अँड. आशिष शेलार यांनी केले आहे

00000

वृत्त क्रमांक 1277   जिल्हा माहिती कार्यालयातील रद्दी विक्रीसाठी उपलब्ध   नांदेड (जिमाका) ,  दि .   5 :-   जिल्हा माहिती कार्यालय ,   नांदे...