योजनांविषयक सर्वसामान्यांची साक्षरताही आवश्यक
- जिल्हाधिकारी अभिजीत राऊत
नांदेड (जिमाका) 19 :- लोककल्याणकारी राज्याच्या संकल्पनेत ज्यांच्यासाठी योजना आखल्या जातात त्या योजनांबाबतची माहिती, साक्षरता लाभार्थ्यांना देणे अत्यावश्यक असते. त्यादृष्टिने शासन आपल्या दारी हा अभिनव उपक्रम अत्यंत महत्वाचा आहे. यासाठी केले जाणारे कागदावरचे नियोजन आता जिल्ह्यातील सर्व शासकीय यंत्रणांनी प्रत्यक्षात उतरून योजनांबाबतचा आत्मविश्वास लाभार्थ्यांपर्यंत पोहचविण्यास कटिबद्ध व्हा, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले. शासन आपल्या दारी या उपक्रमाच्या प्रस्तावित भव्य कार्यक्रमाच्या नियोजन बैठकीत ते बोलत होते.
डॉ. शंकरराव चव्हाण जिल्हा नियोजन भवन सभागृहात झालेल्या या बैठकीस जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, मनपा आयुक्त डॉ. महेश डोईफोडे, मुख्यमंत्री जनकल्याण कक्षाचे प्रमुख गजानन पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर, उपजिल्हाधिकारी शरद मंडलिक, जि.प.चे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदिप माळोदे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक डॉ. संजय तुबाकले सर्व विभाग प्रमुख यांची यावेळी उपस्थिती होती.
सर्वसामान्यांच्या विकासाची संकल्पना राबवितांना अप्रत्यक्षपणे योजनेला मूर्त स्वरूप हे सकारात्मक दृष्टिकोन बाळगणारे लाभधारक देत असतात. त्यांच्या मनातील विश्वास वाढावा, शासकीय योजनांचे प्रतिबिंब त्यांच्या विकासात उमटावे, योजनांच्या उद्दीष्टाप्रती त्यांच्या मनात सजगता निर्माण व्हावी या उद्देशाने शासन आपल्या दारी हे अभियान महत्वाचे आहे. यावेळी मुख्यमंत्री जनकल्याण कक्षाचे प्रमुख गजानन पाटील यांनी उपक्रमाबाबत व नियोजनाबाबत अमूल्य सूचना केल्या.
0000



No comments:
Post a Comment